पुणे : ‘गावाकडून पुण्यात आल्यानंतर शहराची ओळख झाली, शिक्षणाच्या विविध वाटा सापडत गेल्या. जगण्याला शिस्त लागली. जीवनातील शाश्वत मूल्ये अंगीकारता आली. विद्यार्थी सहायक समितीतून मिळालेल्या संस्कारामुळे आयुष्याला दिशा मिळाली,’ असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आणि विद्यार्थी सहायक समितीचे माजी विद्यार्थी डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी केले.
विद्यार्थी सहायक समितीच्या माजी विद्यार्थी मंडळातर्फे यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. या वेळी समितीचे कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर पाटील, माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत कुलकर्णी यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
डॉ. अरविंद शाळिग्राम म्हणाले, ‘समितीतल्या अनेक सवयी आजही पाळतो. त्यांचा उपयोग होतो. जगण्याला शिस्त लागली. दिनक्रम शिस्तीमध्ये असावा. इथे असताना शेतीच्या कामात क्रिएटिव्ह आणि काम केल्याचे समाधान मिळाले. प्रत्येकाने आपल्या प्रगतीचा विचार करताना मूल्य सांभाळली पाहिजे. ती रुजवली पाहिजे. समाजाला पुढे नेण्यासाठी माझे काय योगदान आहे, याचा विचार व्हावा. नोकरी, व्यवसायासाठी आवश्यक गोष्टी शिकून घ्याव्यात. स्वतःवर विश्वास ठेवावा.’
प्रभाकर पाटील यांनी प्रास्ताविक केले. समितीच्या भावी योजनांविषयी तुकाराम गायकवाड यांनी माहिती दिली. डॉ. प्रसाद आंबीकर यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत कुलकर्णी यांनी आभार मानले.